दिनविशेष २१ ऑगस्ट
दिनविशेष
दि. २१ ऑगस्ट
■ दिनविशेष
१. जागतिक उद्योजक दिवस (World Entrepreneurs Day)
उद्योजकता म्हणजे फक्त एखादा व्यवसाय सुरु करणे नव्हे तर त्यात स्वतःला पूर्णपणे वाहून घेणे. बहुतेकांचं व्यवसायाप्रती असलेलं आकर्षण हे त्यातील श्रीमंतीमुळे असतं, पण खऱ्या उद्योजकाला त्यातल्या पैशापेक्षा त्यातून मिळणाऱ्या समाधानाची जास्त आस असते
पैसा सगळीकडेच आहे. जगातल्या मोठमोठ्या कंपन्यांचे सगळ्यात मोठे नोकर म्हणजे CEO हे काही शे कोटींमधे पगार मिळवतात. कित्येक उद्योजकांना ते आपल्या उभ्या आयुष्यातही शक्य होत नाही. पण म्हणून त्यांना आपल्या व्यवसायात काही कमी जाणवत नाही, किंवा त्यांना त्या नोकरीच आकर्षण वाटत नाही
स्वतःच्या विचाराने पुढे जाणे, आपले कौशल्य पणाला लावणे, धोका पत्करणे, अशक्य गोष्टींनाही शक्य करण्यासाठी प्रयत्न करणे, बहुतेकांसाठी ज्या गोष्टी स्वप्नातही शक्य नसतात त्या प्रत्यक्षात मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, स्वप्न पाहणे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे, आशा-निराशा यश-अपयश संकट-समाधान न्याय-अन्याय योग्य-अयोग्य अशा सगळ्या गोष्टींना मनाची कोणतीही चलबिचल न होऊ देता एकसारख्याच विचाराने आणि धैर्याने सामोरे जाण्याची जिद्द असणे, कोण म्हणत शक्य नाही असं प्रश्न स्वतःलाच विचारने, हा प्रश्न विचारताना स्वतःच्याच क्षमतेला आव्हान देणे अशा अनेक गोष्टींमधून उद्योजक घडत असतो
उद्योजकता हे एक झपाटलेपण आहे. खऱ्या उद्योजकाला व्यवसायाशिवाय करमत नाही, तो त्यातच रमतो, तो त्यातच आपले आयुष्य खर्ची घालतो, त्यासाठीच आपले सर्वस्व पणाला लावतो, तो त्याच्याशिवाय स्वतःच्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही... उद्योजक हा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत उद्योजकच असतो, तो कधीही रिटायर होत नाही...
उद्योजकता हे व्यसन आहे, आणि हे व्यसन ज्याला जडतं त्याच आयुष्य एखाद्या पुस्तकासारखंच बनून जातं... अगदी संग्रही ठेवावं असं... कधीही नजरेसमोरून ढळू देऊ नये असं... त्यातलं कोणतंही पान कधीही वाचायला सुरुवात केली तरी नेहमीच काहीतरी नवीन शिकल्याचा आनंद मिळेल असं...
◆ जन्म
१. (१८७१) भारत सेवक समाजाचे एक संस्थापक सदस्य, सेवासदन या संस्थेचे शिल्पकार, सहकारी चळवळीचे आद्य समर्थक गोपाळ कृष्ण देवधर यांचा जन्म
'भारत सेवक समाजा’च्या ज्ञानप्रकाश या दैनिकाचे व शेती आणि शेतकरी या नियतकालिकांचे संपादनकार्य त्यांनी केले. महात्मा गांधींनी सुरू केलेल्या अखिल भारतीय अस्पृश्यताविरोधी संघटनेचे ते प्रांतिक अध्यक्ष होते
विशुद्ध सेवाभावाने व राष्ट्रीय उद्धाराचे भान राखून आमरण लोकसेवा करणारा एक थोर भारत सेवक म्हणून देवधरांचे नाव कायम राहील. ‘सेवासदन’ संस्था ही तर त्यांच्या समाजसेवेचे मूर्तिमंत प्रतीक होय
२. (१९१०) जगप्रसिद्ध चित्रकार नारायण बेंद्रे यांचा जन्म
ते विसाव्या शतकातील मराठी, भारतीय चित्रकार होते
३. (१९२६) गायिका, अभिनेत्री जयमाला शिलेदार यांचा जन्म
१९४२ पासून त्यांनी मराठी संगीत रंगभूमीवर अनेक अजरामर भूमिका यांनी केल्या. २००३ मध्ये त्यांची मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी एकमताने निवड झाली होती. हे नाट्यसंमेलन अहमदनगर येथे भरवण्यात आले होते
४. (१९३४) महाराष्ट्राचे १३ वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म
ते जागतिक ख्यातीचे जलतज्ञ होते. २५ जून, १९९१ ते २२ फेब्रुवारी, १९९३ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते
● मृत्यू
१. (१९३१) महाराष्ट्रातील संगीत प्रसारक गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर यांचे निधन
हिंदुस्थानी संगीताच्या प्रचाराकरता आणि प्रसाराकरता पलुस्करांचे मोठे योगदान आहे. त्यांनी संगीतविषयक क्रमिक पुस्तके लिहिली. हिंदुस्तानी रागसंगीताचा प्रसार-प्रचार व्हावा, ते शिकण्याची सोय व्हावी या हेतूने त्यांनी संपूर्ण भारतात ठिकठिकाणी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयांची स्थापना केली
२. (१९८१) गांधीवादी देशभक्त शिक्षकतज्ञ काकासाहेब कालेलकर यांचे निधन
३. (२००१) जेष्ठ अभिनेते शरद तळवलकर यांचे निधन
ते मराठी चित्रपटांतील अभिनेते होते. चेहऱ्यावरील भावातुनच विनोद आणि वेदना दाखविणारे शरद तळवलकर विनोदी अभिनेता म्हणून अभिनय करतानाच ते दु :खद प्रसंगातही हेलावून टाकणारे त्यांचे भाव चेहऱ्यावर दाखवीत शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते
४. (२००६) सनईवादक भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान यांचे निधन
ते भारतातील प्रख्यात शहनाई वादक होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment