दिनविशेष १४ मे
दिनविशेष
दि. १४ मे
◆ जन्म
१. (१६५७) छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले यांचा जन्म
ते छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते
२. (१९२३) दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते दिग्दर्शक मृणाल सेन यांचा जन्म
मृणाल सेन हे हिंदी व बंगाली भाषेतील चित्रपटांचे दिग्दर्शक होते. ते सत्यजित रे व ऋत्विक घटक यांचे समकालीन दिग्दर्शक होते. त्यांना बंगाली समांतर सिनेमाचे राजदूत समजले जात होते. त्यांच्या चित्रपटात कलात्मकरित्या सामाजिक सत्य प्रदर्शित करण्याकडे त्यांचा कल होता
३. (१९२६) समाजाने दूर अंध:कारात लोटलेल्या कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या, डुडुळगाव येथील आनंदग्रामच्या संस्थापिका, ज्येष्ठ समाजसेविका डॉ. इंदूताई पटवर्धन यांचा जन्म
डॉ. इंदूताई पटवर्धन यांनी १६ व्या वर्षी गांधीजींच्या चळवळीस वाहून घेतले. माँटेसरी शिक्षणक्रम पूर्ण करून त्या शिक्षिका बनल्या. पुढे ब्रिटिश इंडियन रेड क्रॉस आणि सेंट जॉन अॅम्ब्युलन्सच्या कामामध्ये दाखल झाल्या. दुसर्या महायुद्धात त्या प्रत्यक्ष कामासाठी ब्रह्मदेश, जावा येथे गेल्या. सिंगापूर, जपान, येथेही त्यांनी काम केले. पुणे म्युनिसिपल ट्रान्स्पोर्टची स्थापना त्यांनीच केली. सेवेतून (१९५३) निवृत्त झाल्यावर होमिओपॅथीचे त्यांनी शिक्षण घेतले. खेड शिवापूर येथे दवाखाना सुरू केला. आदिवासी आणि सैन्यातील जवानांसाठी त्यांनी सतत परिश्रम घेतले
● निधन
१. (१९२३) कायदेपंडित, समाजसुधारक सर नारायण गणेश चंदावरकर यांचे निधन
कायदेपंडित व समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी ते एक होते. १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना करण्यात न्यायमूर्ती रानडे यांचा महत्वाचा वाटा होता. चंदावरकर काँग्रेसचे आजीव सभासद होते. १८९६ पासूनच चंदावरकर प्रार्थना समाजाचे अध्यक्ष होते. मुंबईस जी विधान परिषद स्थापन झाली, तिचे ते बिनसरकारी अध्यक्ष झाले. त्यांनी रॉयल एशियाटिक सोसायटीचे (मुंबई शाखा) अध्यक्षपद भूषविले. कायदेपंडित म्हणून ते नावाजलेले होते. तरी, सामाजिक जागृती, पत्रकारिता, अस्पृश्यता निवारण वगैरे क्षेत्रांतील त्यांचा सक्रिय सहभाग अत्यंत मोलाचा होता
२. (२०२०) शुद्धलेखन ठेवा खिशात, या छोट्या पुस्तिकेद्वारे शुद्ध मराठी भाषा घराघरात पोहोचवणारे मराठी भाषातज्ज्ञ अरुण फडके यांचे निधन
ते मराठी शुद्धलेखन विषयावर पुस्तके लिहिणारे, त्यासाठी मराठी शिबिरे घेणारे एक तज्ज्ञ होते. त्यांच्या शिबिरात मराठी शुद्धलेखनाचे नियम, वाक्यरचना आणि लिखित मराठी मजकुराचे संपादन हे विषय शिकवले जात. लेखन नियम आणि व्याकरण यांकडे दुर्लक्ष झाले तर ती भाषा संकटात येऊ शकते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. लेखनाच्या नियमांमध्ये एकवाक्यता असणारी भाषाच वेगात प्रगती करू शकते असा त्यांचा विश्वास होता
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment