दिनविशेष २८ फेब्रुवारी
दिनविशेष
दि. २८ फेब्रुवारी
■ दिनविशेष
१. राष्ट्रीय विज्ञान दिवस
भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. या दिवशी रामन इफेक्टचा शोध लागल्याने हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केली होती. या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो
● निधन
१. (१९६३) भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे निधन
त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले. व्यवसायाने वकील असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झाले व बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते बनले. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या राजेंद्रप्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्र प्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले
२. (१९९८) मराठीतील नाट्य-चित्रपट अभिनेते राजा गोसावी यांचे निधन
मराठी सिनेमात विनोदाची मुहुर्तमेढ करणारा, मराठी सिनेसृष्टीतला अढळ तारा 'राजा गोसावी' यांना त्यांच्या विनोदी अभिनयामुळे 'विनोदाचा राजा' म्हटले जात. त्यांनी 'कामा पुरता मामा', 'पसंत आहे मुलगी', 'दिसतं तसं नसतं', यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांत अभिनय केला
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment