दिनविशेष १७ फेब्रुवारी

दिनविशेष

दि. १७ फेब्रुवारी

● निधन

१. (१८८१) क्रांतीवीर, समाजसेवक लहुजी राघोजी साळवे ऊर्फ लहुजी वस्ताद यांचे निधन

ते भारतीय क्रांतिकारक होते. दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्धकलेमध्ये लहुजी निपुण होते. युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, महात्मा फुलेंचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले

२. (१८८३) राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे निधन

ते भारतीय क्रांतिकारक होते. ५ मार्च १८७९ रोजी जेजुरीजवळ वाल्हे गावावर दरोडा टाकला. या लुटीत त्यांना चार बंदुका, तीनशे रुपये व शंभर रुपयाचे कापड मिळाले. यानंतर त्यांनी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. शिरुर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालवला. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांकरता शहरावर कब्जा मिळवला

३. (१९७८) कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचे निधन

रेगे पाश्चात्त्य काव्याच्या काही लकबी मराठीत आणण्याचा प्रयत्‍न करीत होते. इटालियन कवींच्या प्रेमकवितांनी व त्यातून वाहणाऱ्या उत्कट अशा मनोहर भावनांनी त्यांच्या कविमनावर भुरळ पाडली होती. म्हणून त्यांच्या कवितांमधून स्त्री शक्ती आणि तिचे स्त्री देहधारी स्वरूप हेच वेगवेगळ्या स्वप्निल रूपांमध्ये प्रकट होताना दिसते. त्यांच्या काव्यात संस्कृतप्रचुर शब्दांची मधुर पखरण असे. 'जीवन जगले तर साहित्य जगेल असे नसून साहित्य जगले तरच जगण्यासारखे काही उरणार आहे'; अशी त्यांची श्रद्धा व धारणा होती

४. (१९८६) भारतीय तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचे निधन

ते तत्त्वज्ञान व आध्यात्मिक विषयांमधील भारतीय वक्ते व लेखक होते. त्यांच्या विषयक्षेत्रांमध्ये मानसिक क्रांती, मनाचे स्वरूप, ध्यान, मानवी संबंध व समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणे या गोष्टींचा समावेश होता

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर