दिनविशेष ३० जानेवारी

दिनविशेष

दि. ३० जानेवारी

◆ जन्म 

१. (१९२९) हिंदी, मराठी चित्रपटांतील व रंगभूमीवरील अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक रमेश देव यांचा जन्म

त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून अभिनय केला आहे. त्यांनी त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत २०० हून अधिक प्रदर्शनांसह २८५ हून अधिक हिंदी चित्रपट, १९० मराठी चित्रपट आणि ३० मराठी नाटकांमध्ये काम केले. त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि २५० हून अधिक जाहिरात चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी अनेक चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शन मालिकाही दिग्दर्शित केल्या. त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले

२. (१९४९) नाटककार, दिग्दर्शक आणि निर्माते, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा चे संचालक, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते डॉ. सतीश आळेकर यांचा जन्म

'घाशीराम कोतवाल' या नाटकासाठी डॉ. जब्बार पटेल यांच्या बरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकिर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात केली. थिएटर ॲकॅडमी या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. याच संस्थेने रंगमंचावर आणलेल्या 'मिकी आणि मेमसाब', 'महापूर', 'महानिर्वाण', 'बेगम बर्वे' या नाटकांचे आळेकर हे लेखक होते. १९७२ पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची 'महापूर', 'महानिर्वाण' आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला. जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या नाटकांमध्ये या नाटकांचा समावेश केला जातो. या दोन्ही नाटकांवर मराठी आणि इंग्रजीमध्ये स्वतंत्र समीक्षाग्रंथांचीही निर्मिती झाली आहे

सतीश आळेकर यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून केले. कै. पंडित सत्यदेव दुबे यांच्यासारख्या रंगभूमीवरील महान व्यक्तींशी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांचा संवाद सतीश आळेकर यांच्यामुळेच घडू शकला

● निधन

१. (१९४८) महात्मा गांधी यांचे निधन

ते भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. ते एक वकील, वसाहतविरोधी राष्ट्रवादी आणि राजकीय नैतिकतावादी नेते होते. ब्रिटीश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी महात्मा गांधींनी अहिंसक आंदोलनाचा वापर केला. नंतर जगभरातील अनेक नागरी हक्क आणि स्वातंत्र्य चळवळींना महात्मा गांधींकडून प्रेरणा मिळाली. महात्मा असा त्यांचा सन्माननीय उल्लेख प्रथम दक्षिण आफ्रिकेत १९१४ मध्ये केला गेला. आता हा शब्द जगभरात त्यांच्यासाठी वापरला जातो

२. (२०२०) स्त्रियांच्या हक्कासाठी लढणाऱ्या, मिळून साऱ्याजणी च्या संस्थापिका, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन

समता आणि स्वातंत्र्याचा त्या खणखणीत आवाज होत्या. महिलांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. महाराष्ट्रामधील व भारतामधील स्त्रियांच्या पुरुषांबरोबरच्या समान हक्कांविषयीच्या सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर