दिनविशेष ०३ डिसेंबर
दिनविशेष
दि. ०३ डिसेंबर
■ दिनविशेष
१. जागतिक अपंग दिन (World Disabled Day)
दरवर्षी ०३ डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो. अपंगत्व म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये कोणतीही शारीरिक आणि मानसिक समस्या ज्यामुळे तो सामान्य लोकांप्रमाणे काम करू शकत नाही. शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग असण्यासारखे अनेक प्रकारचे अपंग आहेत. अपंग लोकांना त्यांच्या हक्कांविषयी सांगणे आणि इतर लोकांना त्याची जाणीव करून देणे हा या दिनाचा उद्देश आहे
जागतिक अपंग दिनाला संयुक्त राष्ट्रांनी १९९२ मध्ये प्रोत्साहन दिले होते. विकलांग लोकांचे हक्क, आदर आणि काळजी यांविषयी लोकांना अधिक जागरूक करणे तसेच अपंग व्यक्तींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हा या दिवसाचा उद्देश होता. अपंग व्यक्तींना आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या प्रत्येक पैलूचे फायदे सांगणे हा या दिवसाचा उद्देश आहे. हे शारीरिक अपंगत्वाशी संबंधित नाही, परंतु ऑटिझमपासून डाऊन सिंड्रोम आणि मल्टीपल स्क्लेरोसिसपर्यंत सर्व अपंगत्वांचा समावेश आहे
२. वकील दिन (Advocate Day)
भारतात दरवर्षी 3 डिसेंबर रोजी वकील दिन साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो, कारण ते एक प्रख्यात वकील आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे अग्रणी नेते होते
वकील हे न्यायव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ते केवळ कायदेविषयक सल्ला देत नाहीत, तर न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या लोकांसाठी एक आधारस्तंभ म्हणून कार्य करतात. वकील लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आणि समाजात न्याय, समानता, आणि कायद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी काम करतात
या दिवशी न्यायालयांमध्ये वकीलांचे योगदान साजरे करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. विधी विषयक शिक्षणाला प्रोत्साहन दिले जाते आणि वकीलांची मेहनत आणि जबाबदाऱ्या यांना ओळख दिली जाते
वकील दिन आपल्याला वकीलांच्या योगदानाचा सन्मान करण्यास आणि न्याय मिळवण्यासाठी त्यांच्या महत्त्वाच्या भूमिकेची जाणीव करून देतो. हा दिवस वकील क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वांना प्रेरणा देतो
◆ जन्म
१. (१७७६) यशवंतराव होळकर सम्राट (प्रथम) यांचा जन्म
ते होळकर साम्राज्याचे महाराजा होते. यशंवत महाराज सलग इंग्रजांविरुद्ध १८ युद्ध अपराजित राहिले आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला. इंग्रजांविरूद्ध एकही युद्ध न हारणारे एकमेव महाराजा अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते
२. (१८८४) भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा जन्म
ते स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले. व्यवसायाने वकील असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झाले व बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते बनले. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या राजेंद्रप्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली
३. (१८९२) निसर्गकवी माधव केशव काटदरे यांचा जन्म
माधव काटदरे यांनी निसर्ग कवितांशिवाय काही ऐतिहासिक कविताही लिहिल्या. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज असे त्यांच्या कवितांचे विषय होते. याशिवाय काटदऱ्यांनी शिशुगीते व काही विनोदी कविताही लिहिल्या. 'हिरवे तळकोकण' ही काटदऱ्यांची प्रसिद्ध कविता. हिच्यामुळेच ते जनमानसांत ओळखले जातात
● निधन
१. (१९५१) थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे निधन
बहिणाबाईंच्या कविता खानदेशातील त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत. त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इत्यादी सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत. लेवा गणबोली (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे हे काव्य आहे
खानदेशातील आसोदे हे बहिणाईंचे जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी/लेवा गणबोली भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वतः शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख-दुःखे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग - या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते. त्या निरक्षर होत्या. तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. शेतीकाम आणि घरकाम करता करता त्या उत्स्फुर्तपणे ओव्या रचून गात असत
२. (१९७९) भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे निधन
ते भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू होते. त्यांना जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हाॅकीचे खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांना हाॅकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला १९२८, १९३२ व १९३६ मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या काळात भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखला जायचा
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment