दिनविशेष २८ जुलै
दिनविशेष
दि. २८ जुलै
■ दिनविशेष
१. जागतिक निसर्ग संवर्धन दिन (World Nature Conservation Day)
मानवाला आपल्या पुढच्या पिढ्यांना जगवायचं असेल तर शाश्वत विकासाच्या मार्गाशिवाय कोणताही पर्याय नाही. त्यासाठी निसर्ग आणि त्यातील प्रत्येक घटकाचं संवर्धन करणं ही अत्यावश्यक बाब बनली आहे
जागतिक निसर्ग संवर्धन दिन दरवर्षी २८ जुलै रोजी साजरा केला जातो. हा दिवस निसर्ग आणि पर्यावरणाचे महत्त्व दर्शवतो. स्वच्छ पर्यावरण हा निरोगी आणि स्थिर मानवी समाजाचा पाया आहे हे मान्य करण्यासाठी या दिवशी जगभरात विशेष जनजागृती मोहिमेचे आयोजन केले जाते. जागतिक निसर्ग संवर्धन दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश पृथ्वीवरील नैसर्गिक वातावरणातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले प्राणी आणि झाडे वाचवणे हा आहे. त्यामुळे निसर्गाचे रक्षण करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे
पृथ्वी वाचवण्यात संसाधनांच्या संवर्धनाची महत्त्वाची भूमिका आहे. पाणी, हवा, माती, ऊर्जा, खनिजे, वनस्पति, प्राणी, पक्षी अशा निसर्गाच्या अनेक अंगांचे जतन करून नैसर्गिक सौंदर्याचा समतोल राखता येतो. रशियन विचारवंत लिओ टॉलस्टॉय म्हणतो की, मानव आणि निसर्गामध्ये असलेला सकारात्मक बंध कायम राहणे ही आनंदी जीवन जगण्यासाठी सर्वात महत्वाची आणि प्राथमिक गोष्ट आहे. तसेच महात्मा गांधीनीही म्हटलं आहे की, पृथ्वीकडे प्रत्येकाची गरज भागवण्याची क्षमता आहे पण प्रत्येकाची लालसा किंवा लालच भागवण्याची क्षमता नाही
जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचा इतिहास फारसा कोणाला माहिती नाही. मात्र २८ जुलै हा दिवस दरवर्षी जागतिक निसर्ग संवर्धन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मानवाने आपल्या सुख सोयीसोयींसाठी निसर्गाच्या केलेल्या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचा आजचा दिवस आहे. निसर्गाचे आपल्या परिने कसे संवर्धन करता येईल यासाठी एक पाऊल उचलणे, जनजागृती करण्याचे काम आजच्या दिवशी केले जाते. निसर्गाचे संवर्धन न केल्याने माणसांना ग्लोबल वॉर्मिंग, विविध आजार, वातावरणीय बदल, प्राकृतिक बदलांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीला चांगले आयुष्य हवे असल्यास आपल्या जवळ असलेल्या सुंदर निसर्गाचे संगोपन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे
नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे जग सुंदर आहे, त्यामुळे याचा विचार आपण करायला हवा. त्याच्या रक्षणासाठी आपण पुढे येऊया. तुमचे आरोग्य तुम्ही निसर्गाच्या संपर्कात घालवलेल्या वेळेशी थेट संबंधित आहे, म्हणून निसर्गावर प्रेम करा आणि त्याचे संरक्षण करा. जर तुम्ही काळजी घेतली आणि पृथ्वीवर प्रेम केले तर ती तुमची अधिक काळजी घेईल. पृथ्वीचे जतन केले पाहिजे आणि आपण तिच्या संवर्धनासाठी आपले सर्वोत्तम योगदान दिले पाहिजे. आपल्या निसर्गावर प्रेम करणे आणि त्याचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे
◆ जन्म
१. (१९७५) चित्रपट दिग्दर्शक राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर यांचे निधन
त्यांनी मास्टर विनायक आणि राजा परांजपे यांचे साहाय्यक म्हणून चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली आणि १९६० च्या सुमारास मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कथानकांवर आधारित अनेक कौटुंबिक चित्रपट दिग्दर्शित केले. यानंतर १९७० च्या दशकात दादा कोंडके यांचे विनोदी चित्रपट येऊ लागले त्याआधीच राजा ठाकुर यांनी 'नवचित्र' या बॅनरखाली तसेच चित्रपट काढले होते
त्यांनी दिग्दर्शित केलेले मी तुळस तुझ्या अंगणी (१९५५), रंगल्या रात्री अश्या (१९६२), एकटी (१९६८), मुंबईचा जावई (१९७०), घरकुल (१९७१) आणि जावई विकत घेणे आहे (१९७२) हे चित्रपट प्रसिद्ध आहेत. या चित्रपटांसांठी त्यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मुंबईचा जावई' (१९७०) या चित्रपटाला प्रादेशिक भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता
● निधन
१. (१९७७) मराठी रंगभूमी व चित्रपट सृष्टीतील गायक आणि अभिनेते पंडित राव नगरकर यांचे निधन
व्ही. शांताराम यांनी १९५०-५१ साली त्यांच्या अमरभूपाळी या बोलपटातील होनाजीच्या भूमिकेसाठी पंडितरावांची निवड केली. त्या बोलपटात लता मंगेशकर आणि पंडितराव यांनी जोडीने गायिलेली ‘घनःश्याम सुंदरा’ ही भूपाळी अविस्मरणीय ठरली. मधुर आवाज, मार्दवता, तल्लीनता आणि भावमधुरता हे त्यांच्या गायनातले उल्लेखनीय गुण होते
२. (२०१६) बंगाली लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेता देवी यांचे निधन
नोकरी करत असतानाच त्यांनी समाजसेवा आणि आदिवासींच्या कल्याणकारी कार्यक्रमांचे आयोजन केले. पुढे त्यांनी पत्रकारिता केली. युगांतर आणि वर्तिका ह्या मासिकातून स्तंभलेखन केले
इ.स. २००२ मध्ये साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना ऑफिसर ऑफ आर्टस अँड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर केला गेला. याशिवाय भारतातही त्यांना साहित्य अकादमी ने सन्मानित केले आहे. त्यांना इ.स. १९९६ सालचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment