दिनविशेष २६ मार्च

दिनविशेष

दि. २६ मार्च

१. (१९०७) हिंदीतील प्रतिभावान कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ महादेवी वर्मा यांचा जन्म

त्यांना हिंदी साहित्य जगतातील छायावादी युगाच्या चार प्रमुख स्तंभांपैकी एक समजले जाते. आधुनिक हिंदीच्या समर्थ कवी असल्यामुळे त्यांना 'आधुनिक मीरा' पण म्हंटले जाते. कवी निराला ह्यांनी तर त्यांचा हिंदीच्या विशाल मंदिरातील सरस्वती असा उल्लेख केला आहे

प्रतिभावान कवयित्री व गद्य लेखिका महादेवी वर्मा संगीतातपण निपुण होत्या. त्याचबरोबर कुशल चित्रकार व सृजनात्मक अनुवादक पण होत्या. त्यांना हिंदी साहित्यातील सगळ्याच मोठ्या पुरस्कारांनी गौरविले गेले

२. (१९३९) जेष्ठ समीक्षिका पुष्पा भावे यांचा जन्म

त्या स्त्री चळवळीच्या कार्यकर्त्या, समीक्षक, रंगभूमीच्या भाष्यकार होत्या. त्यांचे साहित्य, समाज आणि राजकीय चळवळीतील योगदान महत्त्वपूर्ण आहे

त्या मराठीच्या प्राध्यापक आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक होत्या. मराठी भाषा आणि मराठी नाटक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी नाटकांविषयी आणि एकूण नाट्यसृष्टीविषयी भरपूर लेखन केले आहे. अनेक गाजलेल्या नाटकांची त्यांनी केलेली समीक्षणेही गाजली आहेत

विद्यार्थिदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी पुष्पाताईंचा संपर्क होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला होता.  स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्या रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत पुष्पाताई या लाटणे मोर्चात हिरिरीने सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारशी संघर्ष करण्यात पुष्पाताई अग्रभागी होत्या. स्त्रीवादी चळवळीची पाठराखण करणाऱ्या पुष्पाताईंनी दलित स्त्रियांच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये त्या आरंभापासून होत्या. डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीत हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये त्या समर्थक राहिल्या. सामाजिक कृतज्ञता निधी या सामाजिक कार्यकर्त्यांना मानधन देणाऱ्या उपक्रमामध्ये पुष्पाताई सतत अग्रभागी असत


३. (१९६५) कर्नाटक मधील राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते प्रकाश राज यांचा जन्म

४. (२००८) दलित साहित्यिक, आंबेडकरवादी साहित्यासाठी ओळखले जाणारे मराठी लेखक, कवी बाबुराव बागूल यांचे निधन

विद्रोही आंबेडकरवादी कथांचे प्रमुख उद्गाते आणि प्रखर वास्तववादी कादंबरीकार तसेच शोषित, उपेक्षित, झोपडपट्टीतील, फुटपाथवरील भणंग जनजीवनाचे भेदक चित्रण करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख होती

प्रस्थापित समाजव्यवस्थेतील दोषांचे दर्शन घडवणाऱ्या त्यांच्या कथा १९६३ साली ‘जेव्हा मी जात चोरली होती’ या कथासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाल्या. नंतर १९६९ सालात ‘मरण स्वस्त होत आहे’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. 'अघोरी', 'कोंडी', 'पावशा', 'सरदार', 'भूमिहीन', 'मूकनायक', 'अपूर्वा' अशा कथा-कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात नवा प्रवाह आणला

५. (२०१२) प्रसिद्ध गीतकार माणिकराव गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांचे निधन

मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. 'वाऱ्याने हलते रान' ह्या त्यांच्या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला. त्यांचे पाच काव्यसंग्रह आणि सात ललित लेखसंग्रह आजवर प्रकाशित झाले आहेत

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर