दिनविशेष
दि. १४ मार्च
१. (१९३१) पहिला भारतीय बोलपट आलम आरा मुंबई मध्ये प्रदर्शित झाला
२. (१९३१) अवघ्या नाट्यरसिकांचा लाडके, लखोबा लोखंडे साकारणारे, संगीत अकादमी, महाराष्ट्र गौरव पुरस्कार सन्मानित महानायक, दिग्दर्शक, नाट्यनिर्माते प्रभाकर विष्णू पणशीकर यांचा जन्म
प्रल्हाद केशव अत्रे लिखित 'तो मी नव्हेच' ह्या नाटकात साकार केलेल्या पाच वेगवेगळ्या भूमिकांमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले. त्यांनी स्थापन केलेल्या नाट्यसंपदा ह्या नाट्यंसंस्थेचे 'कट्यार काळजात घुसली' हे संगीतनाटक विशेष प्रसिद्ध झाले
३. (१९५३) समाजातील विषमता नष्ट होऊन, समाज एकजिनसी व्हावा यासाठी आपले आयुष्य वेचणारे लेखक, कवी, संशोधक, वक्ते आणि अभ्यासक प्रा. अरुण कृष्णाजी कांबळे यांचा जन्म
प्रा. अरुण कांबळे हे दलित चळवळीचे लढाऊ नेते नामांतर लढा व मंडल आयोग अंमलबजावणीचा पाठपुरावा करणारे अग्रणी नेते आणि मराठी साहित्यातील चिकित्सक लेखक-संशोधक व साहित्याचे गाढे अभ्यासक होते. ते दलित पॅंथर्स या संघटनेचे संस्थापक-सदस्य व अध्यक्ष होते. समाजातील विषमता नष्ट होऊन, समाज एकजिनसी व्हावा यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. प्रभावी वक्तृत्व हा त्यांच्या कणखर नेतृत्वाचा एक भाग होता
४. (१९९८) सलग ९ मराठी सिनेमांद्वारे चित्रपटगृहात रौप्यमहोत्सवी आठवडा साजरा करणारे गिनीज बुक नोंद विश्वविक्रमी मराठी अभिनेते, निर्माते दादा कोंडके यांचे निधन
ते मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगनाट्यातून व चित्रपटांतून अभिनय केला. द्वि-अर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेत तसेच हिंदी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती केली
विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस-लिखित वगनाट्यामुळे दादा कोंडके अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. इ.स. १९६९ साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. सोंगाड्या (इ.स. १९७१), आंधळा मारतो डोळा (इ.स. १९७३), पांडू हवालदार (इ.स. १९७५), राम राम गंगाराम (इ.स. १९७७), बोट लावीन तिथे गुदगुल्या (इ.स. १९७८) हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट होत
५. (२००३) मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजविणारे लोकप्रिय कवी, गीतकार गझलसम्राट कविवर्य सुरेश भट यांचे निधन
सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यामुळे त्यांना 'गझल सम्राट' असे मानाने संबोधले जाते
६. (२०१०) ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक आणि कवी गोविंद विनायक करंदीकर उर्फ विंदा करंदीकर यांचे निधन
विंदा करंदीकर हे मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, व समीक्षक होते. देशाच्या साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च प्रतिष्ठेचा एकोणचाळिसावा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना 'अष्टदर्शने' या साहित्यकृतीसाठी प्रदान करण्यात आला. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रजांनंतर हा पुरस्कार मिळवणारे ते तिसरे मराठी साहित्यिक होते. याशिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान व पुरस्कार प्रदान करण्यात आले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment