दिनविशेष २१ फेब्रुवारी
दिनविशेष
दि. २१ फेब्रुवारी
* आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन दर वर्षी २१ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. १७ नोव्हेंबर १९९९ ला युनेस्को ने हा दिवस आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून जाहीर केला. २००० पासून आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन जगभरात शांतता, बहुभाषिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सर्व मातृभाषांचे संरक्षण करण्यासाठी साजरा करण्यात येऊ लागला. भाषा आपल्या मूर्त आणि अमूर्त वारसाचे जतन आणि विकास करण्याचे सर्वात शक्तिशाली साधन आहे
१. (१८९४) वैज्ञानिक डॉ. शांतिस्वरुप भटनागर यांचा जन्म
ते भारतीय रसायनशास्त्रज्ञ होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचा औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीने भारतात राष्ट्रीय प्रयोगशाळांची आणि वैज्ञानिक संशोधन केंद्रांची मालिका स्थापन करण्यात भटनागर यांनी बहुमोल कामगिरी केली. कौन्सिल ऑफ सायन्टिफिक ॲन्ड इंडस्ट्रियल रिसर्च (सी.एस.आय.आर.)चे ते शिल्पकार होते
२. (१८९६) हिंदी साहित्यिक सूर्यकांत त्रिपाठी निराला यांचा जन्म
वृत्तीने ते बंडखोर आणि विचाराने क्रांतिवादी होते. आर्थिक संघर्षाबरोबरच साहित्यिक मान्यतेसाठीही त्यांना संघर्षच करावा लागला. जीवनभर कराव्या लागलेल्या संघर्षाचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर व परिणामतः काव्यावर झालेला आहे
३. (१९४२) प्रसिद्ध मराठी अभिनेत्री जयश्री गडकर यांचा जन्म
राजा परांजपे दिग्दर्शित गाठ पडली ठका ठका या चित्रपटात त्यांना सर्वप्रथम महत्त्वाची भूमिका मिळाली. त्यानंतर त्यांनी सतत पुढेच पावले टाकली. आलिया भोगासी या चित्रपटापासून त्यांची नायिका म्हणून कारकीर्द सुरू झाली. जयश्री गडकर यांना मानिनी, वैंजयंता, सवाल माझा ऐका व साधी माणसं या चित्रपटांसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत
४. (१९७७) साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत रा. श्री. जोग यांचे निधन
त्यांनी ‘निशिगंध’ ह्या टोपण नावाने कवी म्हणून साहित्यक्षेत्रात प्रथम पदार्पण केले. ज्योत्स्नागीत (१९२६) व निशागीत (१९२८) हे त्यांचे दोन काव्यसंग्रह. सरल भावाविष्कार हे त्यांतील कवितांचे वैशिष्ट्य. पुढे मात्र त्यांनी साहित्यशास्त्र व काव्यसमीक्षा हेच आपले कार्यक्षेत्र मानले. अभिनव काव्यप्रकाश (१९३०) या ग्रंथात संस्कृत काव्यशास्त्राची तत्त्वे साररूपाने मराठीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अशा प्रकारचा हा पहिलाच सुव्यवस्थित उपक्रम असल्याने त्याला महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकांत अग्रस्थान मिळाले. या ग्रंथाच्या पुढील परिवर्धित आवृत्त्यांतून त्यांनी संस्कृत काव्यशास्त्रातील तत्त्वांशी पाश्चात्त्य वाङ्मयविचारांची सांगड घालण्याचा पुष्कळ यशस्वी प्रयत्न केलेला आहे
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment