दिनविशेष ४ डिसेंबर
दिनविशेष
दि. ०४ डिसेंबर
* भारतीय नौदल दिन
इ. स. १९३४ मध्ये ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ (आरआयएन) या सेनेपासून सुरुवात झाली. इ.स. १९७१ च्या भारत व पाकिस्तान युद्धामध्ये नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झाले. हा क्षेपणास्त्र हल्ला चढविण्यात आला तो दिवस ४ डिसेंबर ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते
१. (१६७५) महाराणी ताराराणी (करवीर) यांचे निधन
राजाराम महाराजांच्या निधनानंतर राज्यकारभाराची सर्व सूत्रे हाती घेउन ताराबाईंनी मोगली फौजांना मागे सारण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी मराठेशाहीतील मुत्सद्यांना काळाचे गांभीर्य समजावून देऊन शेवटपर्यंत या सगळ्यांबरोबर एकजुटीने राहून शत्रू थोपवून धरला. त्या स्वतः लष्करापुढे येउन लष्कराचा आत्मविश्वास वाढवित. मराठ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी त्यांनी मोगली मुलुखावर स्वाऱ्या करून चौथाई आणि सरदेशमुखी गोळा करून आर्थिक बळ वाढवले
ताराबाईंनी करवीर राज्याची म्हणजे कोल्हापूरच्या राजगादीची त्यांनी स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामागे त्यांनी समर्थपणे राज्याची धुरा सांभाळली. सरसेनापती संताजी, धनाजी यांना बरोबर घेऊन त्यांनी मोगलांना सळो की पळो करून सोडले
२. (१९४२) मराठी लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म
ते महाराष्ट्रातल्या वसई येथील कॅथॉलिक पंथीय ख्रिस्ती धर्मगुरू व मराठी लेखक आहेत. ख्रिस्ती धर्म हा त्यांचा प्रमुख अभ्यासविषय असून त्यांविषयी त्यांनी मराठीतून लेखन केले आहे
फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले, तरी त्यांची खरी ओळख ती नाही. दिब्रिटो हे पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरुद्ध आवाज उठविणारे कार्यकर्ते आणि सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व अशी आहे. ’सुवार्ता’ या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले. त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्तीधर्मीयांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाचा स्वतंत्र ठसा उमटला. ’हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली. वसईतील ’राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ यांच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोठी मोहीम राबविली
३. (१९७४) शंकर केशव कानेटकर ऊर्फ ’कवी गिरीश’ यांचे निधन
हे मराठी कवी होते. साताऱ्यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत. कवी गिरीश हे रविकिरण मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते
कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. माधव ज्युलियन यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड ना.वा. टिळक यांच्या ख्रिस्तायनची प्रत संपादित केली
४. (२०२१) पत्रकारितेचे आधारस्तंभ विनोद दुआ यांचे निधन
विनोद दुआ हे टीव्ही पत्रकारितेतील मोठे नाव होते. ४२ वर्षे इतका प्रदीर्घ काळ त्यांनी चौफेर पत्रकारिता केली. जिंदादिल व्यक्तिमत्व असलेले दुआ हे दूरदर्शनवर जनवाणी हा कार्यक्रम करायचे. त्यातून ते प्रकाशझोतात आले. दूरदर्शनवरील निवडणूक विश्लेषण कार्यक्रमांतही दुआ यांचा दबदबा होता. त्यानंतर अनेक वर्षे ते एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीत होते. 'ज़ायका इंडिया का' हा त्यांचा शो सर्वाधिक लोकप्रिय ठरला. शेवटच्या काळात त्यांनी वायर संस्थेसाठी काम केलं
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment