दिनविशेष २८ सप्टेंबर

दिनविशेष

दि. २८ सप्टेंबर

* माहिती अधिकार हक्क दिन

जागतिक पातळीवरचा माहितीचा हक्क दिन प्रथम २८ सप्टेंबर २००३ रोजी साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने २८ सप्टेंबर हा दिवस माहितीचा अधिकार दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. नागरिकाला सरकार दरबारी नेमके काय चाललंय, हे समजून घेण्याचा अधिकार (माहितीचा अधिकार) मिळालेला असतो व त्याचे महत्त्व सकलजणांना पटावे म्हणून या सोहळ्याचे प्रयोजन असते. आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, आपण कररूपाने भरत असलेल्या निधीचा सुयोग्य वापर करतात ना, हे समजून घेण्याचा या अधिकारामागचा हेतू असतो. या दिवशी निमसरकारी संघटना आणि प्रत्येक नागरिक वैयक्तिकरित्या काही कार्यक्रम आखून, लोकजागृती करू शकतात. निमसरकारी संस्था स्थानिक संस्थांत तसेच शाळा कॉलेजात वादविवाद स्पर्धा आयोजित करू शकतात. महाराष्ट्र शासनाने २८ सप्टेंबर राज्य माहिती अधिकार दिन म्हणून घोषित केला आहे

१. (१८८९) चित्रपट आणि रंगभूमीवरील अभिनेते नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते यांचा जन्म

महाराष्ट्र नाटक मंडळींची काही नाटके पाहिल्यानंतर नट होण्याची महत्वाकांक्षा त्यांच्या मनात निर्माण झाली. एका हौशी नाट्यसंस्थेच्या झुंजारराव नाटकातील सारजेची भूमिका हीच केशवरावांची पहिली भूमिका. पुढे एका हितचिंतकाच्या मध्यस्थीने त्यांनी २० मे १९०७ रोजी महाराष्ट्र नाटक मंडळीत प्रवेश केला

कीचकवध हे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे नाटक महाराष्ट्र नाटक मंडळीच्या रंगभूमीवर २२ फेब्रुवारी १९०७ रोजी आले तेव्हापासून त्या नाटकाचा व त्या नाटकातील गणपतराव भागवत यांच्या कीचकाच्या भूमिकेचा अतिशय बोलबाला झाला होता. कीचकाची पत्नी रत्नप्रभा, हिची भूमिका करण्याची संधी केशवरावांना लाभली (१९०८). त्यामुळे त्यांना भागवतांच्या अभिनयकौशल्याचे अगदी जवळून दर्शन घडले. कोणत्याही भूमिकेचा कसा आणि किती विचार केला पाहिजे, नटाच्या जीवनात शिस्तीची आणि चारित्र्याची किती गरज असते आणि नटाने प्रत्येक भूमिका रंगभूमीवर कशी जगली पाहिजे, याचे शिक्षण केशवरावांना भागवतांच्या सान्निध्यात मिळाले

२. (१९०७) क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांचा जन्म  

ते पंजाबी भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी अतुलनीय शोर्य गाजवले


३. (१९६७) क्रांतिकारक आणि थोर तपस्वी पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट यांचे निधन

ते सशस्त्र क्रांतिकारक, तत्त्वचिंतक व लढाऊ समाजसेवक होते. १९२१ ते १९२४ या कालखंडात पुणे जिल्ह्यातील मुळशी पेट्यात धरणग्रस्त गावांकरिता व शेतकऱ्यांकरिता बापट यांनी सत्याग्रहाचा लढा दिला. त्यामध्ये महाराष्ट्रातील जे शेकडो सत्याग्रही सामील झाले त्यांचे त्यांनी नेतृत्व केले. त्यामुळे ‘सेनापती बापट’ या शब्दावलीने ते ओळखले जाऊ लागले

४. (१९८२) ऑलिंपिक मध्ये पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा याचा जन्म

२००८ साली बिजिंग येथे झालेल्या ऑलिम्पिक मध्ये १० मीटर हवाई रायफल प्रकारात त्याने सुवर्ण पदक जिंकले

५. (२०२३) भारतातील कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम.एस. स्वामिनाथन यांचे निधन

हे भारतातील कृषी शास्त्रज्ञ होते. भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी 'एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन'ची स्थापना केली. भारत सरकारने डॉ. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोगाची स्थापन केला

ते गांधीवादी व स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांचा स्वामीनाथनांवर चांगला परिणाम झाला. जगभरांतील कृषी विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी कृषी संशोधनाबरोबर वनस्पतींची पैदास आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन या विषयांवर काम केले आहे. भारतीय गरीब शेतकऱ्यांच्या शेतांत गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्‍पन्‍न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या प्रयत्‍नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर