२. कुणाच्या खांद्यावर कुणाचें ओझें, कुणाचें ओझें?
कुणाच्या खांद्यावर कुणाचें ओझें, कुणाचें ओझें?
कशासाठी उतरावे तंबू ठोकून?
कोण मेले कुणासाठी रक्त ओकून?…
जगभरात सर्वत्र असलेल्या असमानतेमुळेच वर्णद्वेषाविरोधातील आंदोलने होत असून कोरोनाच्या जागतिक साथीच्या या काळात ही असमानता अधिक स्पष्टपणे समोर आली आहे. हे पाहता जग फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची शंका येते, असे विधान संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी काही दिवसांपूर्वी केले आहे.
अँटोनिओ गुटेरेस म्हणाले की, कोरोना संसर्गाने आपल्या समाजाची क्ष-किरण चाचणी करत आपल्यातील दोष दाखवून दिले आहेत. हे दोष जगभरात सर्वत्र आहेत. खुल्या बाजारामुळे सर्वांना आरोग्य सुविधा मिळतील, बेरोजगारांना काम मिळेल, जगात आता भेदाभेद नाही या सर्व खोट्या समजुती असल्याचे सिद्ध झाले आहे. विकसित देशांनी केवळ स्वार्थ पाहिला असून या संकटाच्या काळात विकसनशील देशांना मदत करण्यात ते साफ अयशस्वी ठरले आहेत. गुटेरेस यांनी सामाजिक आणि आर्थिक विषमतेवर टीका केली.
त्यांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे -
१. जगातील निम्म्या लोकसंख्येकडे असलेल्या संपत्तीइतकी संपत्ती केवळ २६ श्रीमंत लोकांकडे आहे
२. जगात वंश, लिंग, वर्ग आणि जन्मठिकाण यावरून प्रचंड असमानता आहे. या असमानतेमुळे लाखो नागरिकांना त्रास होत आहे.
३. वसाहतवादी मानसिकता अद्यापही कायम असून गरीब देशांना जागतिक पातळीवर पुरेसे प्रतिनिधीत्व मिळत नाही.
समस्यांवर सांगितलेले उपाय
१. जागतिक संस्थांमधील असमानता आधी दूर करावी.
२. सामाजिक सुरक्षिततेची नवी यंत्रणा उभारावी.
३. किमान वेतन जगात सर्वत्र समान असावे.
४. मध्यम आणि अल्प उत्पन्न गटांतील मुला-मुलींवर शिक्षणाचा खर्च दुप्पट करावा.
५. लोकांऐवजी कार्बन उत्पादनावर कर लावावा.
भारतातही काही परिस्थिती वेगळी नाही...
१. देशाची ७३ टक्के संपत्ती ही देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या १ टक्के लोकांकडे आहे.
२. आर्थिक असमानता मोठ्या प्रमाणावर आहे.
३. देशातील लोकांचा विचार न करता काहीच लोकांच्या फायद्याचा विचार केला जातो.
४. सर्वसामान्य लोकांना आपल्या मूलभूत गरजा (अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य) भागवता येत नाहीत.
५. समाजातील काही लोकांकडेच सर्व अधिकार एकवटल्यामुळे इतर लोकांना अन्यायाचा सामना करावा लागत आहे.
या सर्व समस्यांवर जर योग्य उपाययोजना करून समस्यांचे समाधान जर केले नाही. तर भारतातही अराजकतेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. याचा सर्वांनीचं गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
- विशाल पवार.
दि. २६ जुलै २०२०
Comments
Post a Comment